मुंबई
‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने योग्य वाटाघाटी न केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा सत्ताधार्यांचा आरोप विरोधकांनी फेटाळला. महाराष्ट्राने गुजरातपेक्षा 12 हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती देऊनही प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘वेदान्त समूहा’ने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडयात ‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. “वेदान्तने तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे,” असे शिंदे-फडणवीस सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते.
विधिमंडळातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे जाहीर केले होते. पण, हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मात्र महाविकास आघाडीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप सरकारकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राने ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पासाठी भांडवली गुंतवणुकीवर 30 टक्क्यांपर्यंत अनुदानातून तीन प्रकल्पांसाठी 34 हजार कोटी, पाणीदरात 337 कोटी, भूखंड दरात 2156 कोटी, मुद्रांक शुल्कात 108 कोटी, विद्युत करात 1396 कोटी, सांडपाणी प्रकल्पविषयक 812 कोटी, अशी एकूण 38 हजार 831 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर सवलती देऊ केल्या होत्या.
तळेगावमध्ये 1100 एकर जागेपैकी 400 एकर जागा मोफत, तर 700 एकर जमीन 75 टक्के दरात देऊ केली होती. शिवाय वीज दरावरील अनुदान वाढवून एकूण प्रोत्साहनपर अनुदानमूल्य 40 हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार होते.
याउलट, गुजरातच्या सवलतींचे एकूण मूल्य 28 हजार 067 कोटी रुपये होते. म्हणजेच महाराष्ट्राने गुजरातपेक्षा 12 हजार कोटी रुपयांच्या सवलती अधिक दिल्या होत्या. गुजरातशी स्पर्धेत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता, असे उद्योग विभागाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबत ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ सकारात्मक असल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या बैठकीत स्पष्ट झाले होते. त्यानंतर खु्द्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
ऑगस्टच्या अखेरीस उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वेदान्त समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यात बैठकही झाली. यानंतर आठवडाभरात अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टरसह इतर काही उद्योगविषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याबाबतची माहिती खुद्द अग्रवाल यांनीच समाजमाध्यमांवरून दिली. त्यानंतरच काही दिवसांतच वेदान्त समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
निकषांबाबत महाराष्ट्र सरस
प्रकल्पासाठी कुशल मनुष्यबळ आणि पूरक पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या उत्पादकांची उपलब्धता, हवामान, नजिकच्या परिसरातील नागरी जीवन या निकषांवर महाराष्ट्रातील जागा गुजरातच्या तुलनेत उजवी असल्याचा अहवालही तयार झाला होता. अनुषांगिक सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनपर अनुदाने या दोन्ही निकषांवर महाराष्ट्रातील जागा गुजरातपेक्षा सरस असतानाही ‘वेदान्त-फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातला गेला हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
‘फॉक्सकॉन’कडून गुजरातमध्ये सर्वेक्षण
‘फॉक्सकॉन’ने बुधवारी गुजरातमधील काही ठिकाणी सर्वेक्षणास सुरूवात केली. आठ-दहा जणांचे पथक सर्वेक्षण करत असून, दोन आठवडयांत प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात येईल, असे गुजरातच्या एका सरकारी अधिकार्याने सांगितले. या प्रकल्पासाठी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’च्या शिष्टमंडळाने गुजरात सरकारबरोबर सहा बैठका घेतल्या होत्या.