घरे रिकामी करण्याच्या सूचना देत पालिकेने बांधकामांची तपासणी सुरु केली
ठाणे
महापालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यात गेले तीन दिवस सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर भागातून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले माती आणि मोठे दगड खाली नाल्यांमध्ये जागोजागी अडकले असून त्याचबरोबर या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यांच्या भिंती पडून त्यालगतची माती खचू लागली आहे. यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा या भागातील नाल्यालगतच्या वस्त्यांमधील घरे धोकादायक झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने अशा घरांमधील नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत होण्याची सुचना देत त्या बांधकामांची तपासणी सुरु केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमधील डोंगरांवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वस्त्या वसलेल्या आहेत. या डोंगरांच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात वस्त्या आहेत. या वस्त्यांमधूनच डोंगरातून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेने नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. या नाल्याच्या भिंतीला लागूनच वस्त्यांमधील घरे असून याठिकाणी पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यापुर्वी महापालिकेने शहरातील अनेक नाल्यांच्या भिंतींची दुरुस्ती तसेच नाले सफाईची कामे केली होती. गेल्या आठवड्यात गेले तीन दिवस सलग अतिवृष्टी झाली.
गुरुवारी अवघ्या अर्ध्या तासात ७१ मीमी पाऊस झाला. यामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका होता की, त्यासोबत माती आणि मोठे दगड वाहून आले. हे दगड आणि माती नाल्यांमध्ये जागोजागी अडकून पडले. यामुळे नाल्यांची उंची कमी होऊन पाण्याचा प्रवाह मिळेल त्या मार्गाने पुढे गेला. या पाण्याच्या प्रवाहासोबत कळव्यातील भास्करनगरमधील एक चार वर्षाचा मुलगा वाहून गेला होता. डोंगरालगत असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमधील रस्ते आणि गल्ल्यांना नदीचे रुप आले होते. या पाण्याच्या प्रवाहामुळेच अनेक ठिकाणी नाल्याच्या भिंतींची पडल्या असून त्यालगतची माती खचू लागली आहे.
अशाचप्रकारे महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूनच असलेल्या नाल्याची भिंतही पडली. या घटनेमुळे इमारतीच्या तळाची माती निघून गेल्याने खांब दिसू लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ही इमारत रिकामी केली होती. वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्येही असेच काहीसे चित्र आहे. या भागातील नाल्यालगतच्या भिंती पडल्याने माती खचून लागली असून यामुळे नाल्यालगतच्या घरांची बांधकामे धोकादायक झाल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने अशा घरांमधील नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत होण्याची सुचना देत त्या बांधकामांची तपासणी सुरु केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.