नवी दिल्ली
आशिया चषकाला सुरुवात होण्यासाठी फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 27 ऑगस्टला आशिया चषकातील पहिला श्रीलंका-बांग्लादेश यांच्यात सामना खेळला जाणार आहे. तर, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून किंग कोहली फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल. अशा खेळाडूंवर एक नजर टाकूया ज्यांच्याकडं आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्ये त्यानं धुमाकूळ घातलाय. बाबर आझमनं आतापर्यंत 74 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.ज्यात त्यानं 45.33 च्या सरासरीनं आणि 129.45 स्ट्राईक रेटनं 2 हजार 686 धावा केल्या आहेत. पाकिस्तानी संघ आपल्या कर्णधाराकडून आशिया चषकात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.
विराट कोहली
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करतोय. परंतु, या खेळाडूच्या क्षमतेबाबत जगाला माहीत आहे.विराट कोहली फॉर्ममध्ये परतला तर भारतीय संघाचा दावा मजबूत होईल. विराट कोहलीनं आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 50 पेक्षा जास्त सरासरी आणि 137.66 च्या स्ट्राइक रेटनं 3 हजार 308 धावा केल्या आहेत.
मोहम्मद रिझवान
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं आपल्या फलंदाजीनं जगावर छाप सोडलीय. रिझवाननं 56 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 50.36 च्या सरासरीनं आणि 128.84 च्या स्ट्राइक रेटनं 1 हजार 662 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यात रिझवाननं शानदार खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
रोहित शर्मा
भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं त्याला हिटमॅन म्हणूनही ओळखलं जातं. विराट कोहली खराब फॉर्ममधून जात असल्यानं अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. रोहित शर्मानं आतापर्यंत भारतासाठी 132 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 31.7 च्या सरासरीनं आणि 140.27 च्या स्ट्राइक रेटनं 3 हजार 487 धावा केल्या आहेत.
हार्दिक पांड्या
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं गेल्या काही सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीनंही जबरदस्त प्रदर्शन केलंय. हार्दिक पांड्यानं 67 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 23.17 च्या सरासरीनं आणि 144.04 च्या स्ट्राइक रेटनं 834 धावा केल्या आहेत.