मुंबई
मुंबईत कोविड, ओमायक्रॉबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनाने भायखळा राणी बागेत पर्यटकांना दुपारी ३ नंतर तिकीट विक्री आणि प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यापुढे सायंकाळी ६ ऐवजी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना राणी बाग परिसर खाली करावा लागणार आहे. यासंदर्भातील माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोविड, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोविड, ओमायक्रॉनचे ८ हजार ६३ नव्या रुग्णांची रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सुदैवाने दिवसभरात कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
राणीच्या बागेत सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या पर्यटकांसाठी ठेवण्यात आलेल्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राणी बागेत सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंतच पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता राणी बागेतून बाहेर पडण्याची वेळ एका तासाने कमी करून सायंकाळी ५ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे राणी बागेत दुपारी ३ वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाणार असून सायंकाळी ५ पूर्वी पर्यटकांना राणी बागेचा परिसर खाली करून आपले घर गाठावे लागणार आहे.