वसई :
खाद्यतेल आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. यात जर भेसळयुक्त तेल असेल तर मानवी आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. अशाच एका खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तिला मनसेकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तिला चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मंगळवारी अविनाश जाधव यांनी नालासोपारा फाटा येथील उमर कंम्पाउड येथे एका अनधिकृत गाळ्यात भेसळयुक्त खाद्यतेलाच्या कारखान्याचा भांडाफोड केला होता. यावेळी एकाच तेलातून पामतेल, रिफाईन्ड तेल आणि झिरो कॅलेस्ट्रॉल असलेलं सनफ्लावर तेल ही बनवलं जात होतं. तेलाचे डबे खराब अवस्थेत होते. तेलाची टाकी ही खराब अवस्थेत होती.
याबाबत तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला जाब विचारल्यावर त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने अविनाश जाधव यांनी त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. नागरीकांच्या आरोग्याशी खेळ चालू, मात्र प्रशासनाचं यावर लक्षच नसल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी यावेळी केला होता.
नागरिकांच्या जीवाशी कसा खेल चालू आहे. याचा भांडाफोड मनसेनं केला आहे. नालासोपारा फाटा येथील उमरकंम्पाउंड येथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्यास घातक खाद्य तेल बनवत असल्याचा भांडाफोड मनसेनं केला. वसई विरार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या गाळ्यावर धाड टाकली. त्यांनी खाद्यतेलाची कशा प्रकारे भेसळ चालू आहे, हे निदर्शनास आणून दिले.